मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
वैभव नाईक यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीदरम्यान रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले. तसेच शिवरायांच्या पुतळ्यातून मिळवलेल्या भ्रष्टाचाराच्या पैश्यांमधून मतदारांना पैसे वाट्ल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. तसेच नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाबद्दल भारतीय नौसेनेने स्पष्टीकरण देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. मुर्तीकार आपटे यांना आतापर्यंच २६ लाख रुपये पोच झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यातील दोन कोटी रुपये नौसेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले, खरंतर आमच्या माहिती प्रमाणे डबल पैसे खर्च झाले आहेत. भारतीय नौसेनेने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. साडेपाच कोटीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारातून मिळालेले पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना वाटण्यासाठी वापरले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल करणार आहे. निलेश राणे यांनी पुतळा पडण्यामध्ये माझ्यावर आरोप लावले, माझ्या विरोधात पाच-सहा दिवसात पुरावे देणार होते ते कुठे गेले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.