नाशिकच्या काळाराम मंदिरात काही आक्षेपार्ह पत्रकांचे वाटप करण्यात आले होते. काळाराम मंदिर आणि परिसरात काजी विशिष्ट समाजातील प्रवर्गाला प्रवेश करण्यास बंदी असल्याचे त्या पत्रकात नमूद करण्यात आले होते. या पत्रकावरून राज्यभरात गदारोळ माजला होता. या प्रकारामुळे नाशिक येथील पंचवटी भागात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले. २३ जून रोजी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या ठिकाणच्या नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढला होता. नाशिक, पंचवटी काळाराम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ टिटवाळा येथे समस्त आंबेडकरी समाज, बहुजन समाज, आदिवासी संघटना, सर्व आंबेडकरवादी पक्ष, संघटनेच्या वतीने निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरी समाजासोबत इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्याण तालुक्यातील
खडवली येथून आपली भूमिका मांडताना भीम अनुयायांनी मनुवादी, जातीवादी वृत्तीच्या लोकांना असा इशारा दिला की “आंबेडकरी सामाज हा शांतीप्रिय समाज आहे, बुद्धाला तसेच बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारा समाज आहे पण आंबेडकरी समाजाला जर कोणी आव्हान दिले तर आम्ही जशास तस उत्तर देऊ” आणि हे कालच्या घटनेमध्ये नाशिक येथील समस्त भीमसैनिकांनी दाखवून दिले आहे. आजच्या मोर्च्यामधील समाजबांधवांनी दाखवून दिले की आम्ही वेगवेगळ्या पक्ष, संघटनेत जरी कार्यरत असलो तरी बात जेव्हा बाबासाहेबांची आणि समाजाच्या अस्तित्वाची येते तेव्हा आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो, असे मत आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केले. यावेळी मोर्च्यामध्ये खडवलीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुनील भाऊ भोईर, दशरथ पांडव, रमेश तांबे, आकाश बोबडे, विकास अनावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिकमधील ही घटना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही किड संपवा … कोण असेल त्याला बेड्या ठोका. आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाऊ. बघू कोण रोखतो. जयभीम, असे म्हटले होते. नाशिकला जो प्रकार घडला त्याची तात्काळ दखल घेऊन आरोपीस अटक करुन कारवाई केल्याबद्दल पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे अभिनंदन सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत म्हणाले की, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना धमकीचे पत्र प्रकाशित करण्यात आले होते. ज्याने ते प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
हे ही वाचा
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा एल्गार, हंगामी अध्यक्ष पॅनलवर टाकला बहिष्कार
Follow Us