राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल (बुधवार, २९ मे) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात मनूस्मृती दहन करत आंदोलन केलं होते. यावेळी, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा फाडली गेली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण देत माफीही मागितली आहे, पण विरोधकांचा रोष पाहता त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीनंतर राज्यभर निदर्शने आणि आंदोलने करण्यात येत आहे. या प्रकरणी राज्यभरात राजकारण पेटले असून काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमांचे दहन देखील करण्यात येत आहे. भाजपसह (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP) आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यात देखील चार ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिसांकडून खबरदारी म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असून आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी याची माहिती दिली. जितेंद्र आव्हाड यांनी “आज मी माफी मागतोय कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे, ” असे म्हणत दिलगिरीही व्यक्त केली आहे. परंतु आता या घटनेला मोठे राजकीय वळण प्राप्त झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. तसेच मनुस्मृतीविरोधातील आंदोलन त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
ट्रॅफिकमुळे पुण्यातून आयटी कंपन्या स्थलांतरित, Ravindra Dhangekar यांची X पोस्ट चर्चेत