३० जून २०२२ रोजी महाराष्ट्रातील राजकारणात महासत्तांतर घडले आणि राजकीय विश्वाची गणितं बदलल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शिंदे गटात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता. आज ३० जून २०२४ रोजी या दिवसाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
विचार, विकास आणि विश्वास! सस्नेह जय महाराष्ट्र, राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली.
विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार. जय हिंद. जय महाराष्ट्र.
हे ही वाचा:
T-20 WORLD CUP मध्ये विजयी झाल्यानंतर MS Dhoni कडून टीमचे कौतुक, म्हणाला…
T-20 World Cup मध्ये भारताची बाजी, ठरले ‘इतक्या’ रकमेचे मानकरी