पंढरपूरच्या विठ्ठलावर (Vitthal of Pandharpur) कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रासहीत देशभरातील असंख्य लोक पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एकदा तरी आपले डोके टेकवतात. आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जात असतो. यानिमित्त देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येत असतात. विठुरायाच्या चरणी भाविक नतमस्तक होतात तसेच विठूच्या प्रेमापोटी लोक दानधर्म करतात. पण आजच्या सोहळ्यासाठी विठुरायाच्या चरणी तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढे दान अर्पण करण्यात आले आहे.
View this post on Instagram
तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या व्यक्तीने दान केले आहे त्याने आपली ओळख उघड न करण्याची अट देवस्थानासमोर ठेवली. एका बातमीत मिळालेल्या माहितीवरून सदर दानशूर भाविक ही महिला असून त्या जालना जिल्ह्यातील असल्याचे कळते.मंदिरातील व्यस्थापक पुदलवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी देवीला सोन्याचे मुकुट, मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज (Kolhapuri Saaj), पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी अशी सोन्याची दागिने दान केली आहेत. तर देवाच्या रोजच्या पूजेअर्चेसाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवासाठी चांदीचा आरसा अशा वस्तूंचा या दानामध्ये समाविष्ट आहेत.
मागील ५० वर्षांपासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या रकमेचे दान करण्यात आले आहे असे मंदिरातील व्यवस्थापक सांगतात. तसेच महिलेने केलेल्या गुप्त दानाचा या वर्षीच्या सोहळ्यात मोठा हातभार लागला आहे. आज वसंतपंचमीसोबतच ७४ व्या प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई (chennai ) व बंगळुरु (Bangalore) येथून रेशमाचे पांढरे वस्त्र मागवण्यात आले आहेत.
तसेच आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा अतिशय भक्तिमय आणि जल्लोषात पार पडला. भक्तिगीतांवर तल्लीन झालेल्या हजारो भाविकांनी अवर्जून हजेरी लावून अक्षता टाकल्या. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दर वर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याचे निमित्ताने संपूर्ण मंदिर आज आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता अक्षता सोहळा पार पडला.
लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात. या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवण ठेवलेले असते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आज पासून रंगपंचमी पर्यत देवाला दररोज पांढरा पोशाख केला जाणार आहे आणि या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची परंपरा आहे. या सोहळ्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून भागवाचार्य अनुराधा शेटे यांचे श्री रुक्मिणी स्वयंवर हे कथानक ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन
Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक
Republic Day 2023, गाडीला तिरंगा लावत आहात? परंतु कोणत्या बाजूने लावतात तुम्हाला माहित आहेत का ?