काही दिवसांपूर्वी रायगडावर पिंडदान होत असल्याचा विडिओ वायरल झाला होता. त्यानंतर पिंडदानावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला. सध्या सगळीकडे यावर मोठा वाद दिसून येत आहे. पिंडदान हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. हिंदू घर्मात पक्षात सर्व पितरांचे तर्पण करण्याची पध्दत आहे. घरोघरी ही प्रथा पाळली जाते. त्यामुळे रायगडावर पितरांचे पिंडदान करण्यात गैर काय असा सवाल आता शिवभक्तांनी उपस्थित केला आहे. या वर्षीच नाही तर गेली अनेक वर्षांपासून युध्दात मृत्यूमुखी पडलेल्या यौध्यासाठी हे तर्पण केले जात असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात येत आहे. गडांवरील हिंदू विधीना विरोध करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रायगडावर राम धुरी आणि त्यांचे काही सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून हा विधी करतात. रायगडाच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या स्मरणार्थ हा पिंडदान केलं जातं. पितृपक्षात घराघरात हा विधी केला जातो. हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडने घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे, असं मत शिवभक्तांकडून व्यक्त केलं जात आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पिंडदानाची पार्श्वभूमी आणि हेतू जाणून घेतला असता तर हा गोंधळ झाला नसता, असं मतही शिवभक्तांनी व्यक्त केलं आहे.
रायगडावर २४ सप्टेंबरला शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते गडावर आले होते. तर याच दिवशी शस्त्रादहीद पितृ श्राध्द असल्याने राम धुरी आणि त्यांच्या सहकारी शस्त्राने जखमी होऊन वीरगती प्राप्त झालेल्या योध्द्यांच्या पिंडदानासाठी सालाबाद प्रमाणे गडावर दाखल झाले होते. शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असलेल्या जागेत ते पिंडदान विधी करत होते. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार पाहीला आणि आणि त्याची चित्रफीत काढून समाजमाध्यमांवर व्हायरल केली होती. यामुळे गदारोळ उडाला. माजी खासदार आणि रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करा म्हणून पत्र लिहीले होते. यानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुढे येऊन या पिंडदान विधीचे समर्थन केले आहे.
हे ही वाचा:
औरंगाबाद-सोलापूरमधून PFI चे कार्यकर्ते ताब्यात