उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी जनसन्मान यात्रा आज शनिवारी दि. २२ सप्टेंबर रोजी पार पडली. रायगड जिल्यातील श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने त्यांनी मायमाऊलींशी, भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आलेल्या यात्रेत अजित पवार म्हणाले की,” ज्या पद्धतीनं पुरुष वर्ग आपल्या स्वप्नांसाठी लढतो, झगडतो आणि स्वप्नं पूर्णत्वास नेतो, त्याचप्रमाणे स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार महिला वर्गाला सुद्धा आहे. मात्र माझी मायमाऊली आपल्या इच्छांना मुरड घालते. आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी राब-राब राबते. मनी बाळगलेल्या इच्छा-आकांक्षा बहिणींना सुद्धा पूर्ण करता याव्यात, यासाठी आम्ही माझी लाडकी बहीण योजना राज्यभर व्यापक स्तरावर राबवण्यास सुरुवात केली.”
पुढे ते म्हणाले की, “सर्व समाज घटकातील गोरगरिबाची लेक चांगली शिकली पाहिजे, तिनं तिच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, यासाठी आम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केलं आहे. खास महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजनेंतर्गत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यातून माझ्या बहिणी सुरक्षित प्रवास करीत आहेत. शेतकरी बांधवांना बळ देण्यासाठी आम्ही वीज बिल माफी दिली आहे. दुधावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊ केलं आहे. एक रुपयात पीक विमा योजना आणली आहे. तसेच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली तशी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफतची योजना आणली. येथे उपस्थित असलेल्या ५२ लाखांच्या आसपास महिलांच्या खात्यात तीन सिलेंडरचे पैसे पडणार असल्याची खात्री अजित पवार यांनी दिली.
त्यानंतर ते म्हणाले की, “आमची मनापासून इच्छा आहे की, राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सर्व योजना या दीर्घकाळ चालाव्यात. परंतु त्याकरता तुमच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ द्या, कोकणसहित अख्ख्या महाराष्ट्राचा गतिमान विकास साधण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो.”
हे ही वाचा:
का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस? जाणून घ्या त्याचे महत्व व इतिहास