शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकार वर एक मोठा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे आणि आता या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा (Semiconductor Project) प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. pic.twitter.com/ipBwOWLKvW
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
तसेच आदित्य ठाकरे यांनी गुजरातमधील सेमीकंडक्टरच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे भारताच्या विकासाचा नवा मार्ग सुरू होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्राला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारे राज्य तयार करण्याचे प्रयत्न केले होते असेही आदित्य यांनी म्हटले.
सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.