दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या विषयावर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “बरोबर आहे, पण या घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. त्या चिखलात मला पडायचंच नाही. म्हणून ज्यांनी या प्रकरणात आरोप केले त्यांच्यासाठी हा अहवाल आहे.” यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी पाटणा येथे जाणार आहे. खास करून तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे. आम्ही दोघेही ३२-३३ असे एकाच वयाचे आहोत. त्याचं बिहारमध्ये चांगलं काम सुरू आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. पर्यावरण आणि इतर त्यांनी हाती घेतलेल्या कामांवरही चर्चा होईल.”
नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे आरोप नारायण राणेंनी केले होते. “आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते अशी लोक चर्चा करतात. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होता का? आता उत्तराखंड केसबद्दल बोलता. चुकीचं झालं असेल, तर कारवाई होईल, आम्ही लपवणार नाही. मात्र, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केलेलं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील,” असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता.
हे ही वाचा :
हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; शेतकरी नेते रविकांत तुपकर