ठाणे : राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील सभांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदित्य ठाकरे आपली शिवसंवाद यात्रा करणार आहेत. तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा भिवंडी, दिंडोरी, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर मधील शिर्डी येथील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे थेट संवाद साधणार आहेत.
आदित्य ठाकरेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन
आदित्य ठाकरे यांच्या शिवसवाद यात्रेला भिवंडी येथून आरंभ होत आहे. तत्पूर्वी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. आदित्य ठाकरे सत्तांतरानंतर ठाण्यात प्रथमच शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पोहोचले आहेत. ठाण्यानंतर भिवंडी येथून खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात होत आहे. भिवंडीनंतर आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा इगतपुरी नाशिकच्या दिशेने वळणार आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे कशा पद्धतीने जनतेला संबोधणार आहे हे पाहणे उत्सुकतेच ठरेल.
‘Shiv Samvad’ – the journey of reaching out to every Shivsainik begins… pic.twitter.com/0gvyF2CvJU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 21, 2022
आदित्य ठाकरे यांच्या संवादयात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटातील युवा सेना देखील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शिवसेनेतील युवा सेनेतून युवा कार्यकर्त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश घेत स्वतंत्र युवा सेना स्थापन करत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा :
काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, मुंबईत ईडी कार्यालावर मोर्चा