आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवी दिल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे.
शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याचा आरोप आहे. यावरून राज्यभरात राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करून त्यांचे कान टोचले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आपल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे सत्तारांना शिंदे यांनी आदेश ददिला होता अशीही माहिती मिळत आहे. वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी बोलावली प्रवक्त्याची बैठक बोलवली असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधू नये, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर अब्दुल सत्तार यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि औरंगाबाद येथील घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
हे ही वाचा :
पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ कडून सुवर्ण संधी