राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) काल (गुरूवार, १३ जून) राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजीनाट्य सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्यसभा खासदारकीची इच्छूक होते पण त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करत “पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे कि कोणी नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत,” असे वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांनी आज (शुक्रवार, १४ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणी नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी सांगितलं होतं की आम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत. पण एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाची दुःखद घटना घडली तर मी त्यांना कसं बोलणार. अर्ज मंजूर झाला आहे आता माघार घेतली नाही तर ते बिनविरोध खासदार झाले. कोणी काय टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे.”
सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवार, १२ जुलै रोजी रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी, सुनेत्रा पवार यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. यानुसार, सुनेत्रा पवार यांनी सकाळी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. त्यांच्याव्यतिरिक्त कोणाचाही अर्ज आलेला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सुनेत्रा पवार यांना दिलेल्या राज्यसभा खासदारकीवरून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी त्या म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही नाराजी दिसलेली नाही. फॉर्म भरतेवेळी भुजबळ देखील पक्षातर्फे उपस्थित होते. त्यांनी देखील मला या शुभेछया दिल्या.”