मुंबई: सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक वेगळे वळण घेत आहे. शिवसेनेतून अचानक ४० आमदार वेगळे झाल्याने शिवसेनेला मात्र मोठा फटका बसला आहे. कालपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीच्या कामाला नव्याने सुरूवात केली आहे. काल शिवसेना भवनात महिला पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. सर्व पदाधिकारी आणि मंत्र्यांना पक्ष वाढवण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
त्यात आता शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा झटका मिळाला आहे. शिवसेनेचे माझी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. (Anandrao Adsul resign as Shivsena leader) अडसूळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आपल्या राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पक्षाबाबत निराशा व्यक्त केली आहे.
अडसूळ यांनी पत्रात अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व आपल्या पाठीशी उभे न राहिल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच ईडीची कारवाई आणि आजारपणात आपली साधी विचारपूस ही न केल्याचे यात म्हंटले आहे. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा आधीपासून शिंदे गटात आहे. या प्रकरणावरून आमदारांपाठोपाठ आता खासदार ही पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या पक्षात आहे. दरम्यान सोमवारी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रात उद्धव ठाकरेंकडे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करण्याची मागणी केली होती. भाजपच्या उमेदवार मुर्मु यांना मत देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे खासदारांच्या मनातील नाराजी ही आता हळू हळू दिसून येत आहे.