सध्या अंधेरी पोटनिवडणुकांमुळे ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आणि शिंदे – फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर ही निवडणूक दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी जरी ठाकरे विरुद्ध शिंदे असा गट असला तरी ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिलाय. तसेच या निवडणुकीबाबत यवतमाळमध्ये पत्रकारपरिषदेदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही कुणाला पाठिंबा देणार असे विचारले असता, त्यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”
“शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचं सुरू होतं त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकतं याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “दुसरं एखाद्या मुख्यमंत्र्याने कायदेशीर पेचप्रसंग तयार झाल्याने राजीनामा दिला, तर पुन्हा सरकार स्थापनेबाबतचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्या काळातील संकेत महत्त्वाचे आहेत. ते संकेत सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतोय की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे.”
“मला असं दिसत होतं की अनेकजण हे मानायलाच तयार नव्हते. सभापतींनी १६ जणांच्या निलंबनावरील स्थगिती उठवली की नाही याचा कोठेही खुलासा होत नाही, अशी स्थिती आहे,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
उद्या समता पार्टी हायकोर्टात मांडणार आपली बाजू; उद्धव ठाकरेंची मशाल धोक्यात ?
आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो; नारायण राणे
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.