Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. “काल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एनकाऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय. हा बेशरम पणा आहे. अफजल गुरुची बरशी करता, तशी आता अक्षय शिंदेची पण बरसी करणार का?” असा थेट सवाल आशिष शेलार यांनी विरोधकांना केला
यावेळी ते पुढे म्हणाले की, “विरोधकांची काय वक्तव्य आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा ? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पिडित बच्चूची मानसिकता तरी समजून घ्या. त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार बाबत, तो झाला की नाही? पोलिसांनी काही नाही केले? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? कुठल्या थराला गेला तुम्ही? याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार तो लिंगपिसासू त्याची माळ हे जपत आहात? असा थेट सवाल करीत “तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले, “शरद पवार साहेब तुम्ही काय बोलत आहात ? हलगर्जीपणा? आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? पोलिसांच्या बंदुकीचा जो हात घालेल, त्याला ठोकयलाच पाहिजे. आम्ही पुर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय? महा विकास आघाडीला सवयच लागली आहे, आतंकवादी, गुन्हेगार असेल त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे व गळा काढायचा. अफझल गुरुची बरसी केलीत उद्या अक्षय शिंदेची बरसी करतील,” असे ते म्हणाले.
“कुठे आहेत उद्धव ठाकरे? त्या लिंगपिसासू विरोधात बोलताना का जीभ अडकत आहे यांची ? आदित्य ठाकरे आज ट्विट करीत आहेत. मग त्यांच्या कडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत? त्यांनी हे कर्तव्य का नाही केले? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत? विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव आहे, त्यांच्यासाठी ईडी चुकीचे, पंतप्रधान व मुख्यमंत्री पद चुकीचे, वातावरण असे निर्माण करायचे की या देशात कायदाच नाही. अक्षय शिंदेने बंदुक घेतली तर या पोलिसांनी काय करायचे होते? बरं ज्याला ठोकला तो कोण आहे ? चिमुरडीसोबत प्रकार केला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल? पोलीस आणि तपास यंत्रणासमोर त्यांची साक्ष झालेय. काही पुरावे गोळा केले गेलेत? आज ते सगळे खोटे ठरवताय?’ असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
हे ही वाचा:
अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…