पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी, नाना पटोले

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी, नाना पटोले

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेचा आम्ही निषेध करतो. पुरोगामी महाराष्ट्रात जाती-पातीला धारा नाही. सरकार तातडीने जात विचारण्याचे प्रकार थांबवावे व संबंधित सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा. या संदर्भात विधानसभेत चर्चा सुरु असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, ‘ गैरसमज पसरु नये, अशा पद्धतीने अफवा पसरवण्याचे काम होऊ नये, २१ शतकातही एखाद्या चुकीचा राईचा पर्वत करण्याची सवय काहींना लागली आहे,’ असे म्हणताच नाना पटोले यांनी हरकत घेतली व शेतकऱ्याला जात विचारली जात असताना त्याला मंत्री राईचा पर्वत म्हणतात? अशी संतप्त विचारणा केली.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, एका महिलेचे मासिक पाळीचे रक्त जबरदस्तीने घेऊन ते जादूटोणासाठी विकल्याचा प्रकार उघड झाला आहे, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धेला थारा नाही पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून राज्यात जादूटोणा व अंधश्रद्धेचे प्रकार वाढले आहेत. महापुरुषांचा अवमान करणा-या बागेश्वर नावाच्या भोंदू बाबावर कारवाई करण्याची धमक सरकार दाखवत नाही असा टोलाही लगावला.

Exit mobile version