रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे, त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे, असा काय गुन्हा केला आहे रोहित पवारांनी? असा सवाल माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत केला आहे. उद्योग आहे, व्यवहार आहे, लहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील. त्याच्यासाठी धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे आणि बदनाम करण्याचं राजकारण सध्या सुरु आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यांचं कारण असं आहे की, रोहित पवार यांनी भूमिका घेतली आहे की, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मुघलशाही पुढे न झुकण्याची. भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आम्हीही घेतली आहे. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर सगळे लोक गप्प बसले असतील. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार असे अनेक लोक आज आहेत. आम्ही तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही. फडणवीस यांनी सांगावं रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो. असे यावेळी संजय राऊत म्हणाले.
रोहित पवार हे कुठे जाणार नाहीत. ते आजोबांबरोबर ठाम राहतील जसे आम्ही आहोत. रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर देखील झाली. त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली, काही पुरावे ईडीने दाखवले ते भाजपमध्ये गेले. कारवाई देखील थांबली. हसन मुश्रीफांच काय झालं? अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाई थांबली. आमच्यासारख्या लोकांचे अनिल देशमुख, रोहित पवार आणि मी असेल अन्य काही लोक आहेत ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत. माझा इशारा आहे की, आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस साजरा
प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा, संजय राऊत