वेदांताचा प्रकल्प गुजरातेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे चालू झाले आहे. आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं (Vedanta Foxconn) राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत, असं ऐकलं आहे. दिल्लीत त्यांनी बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर महाविकास आघाडीने वेदांता प्रकल्पासाठी टक्केवारी मागितली होती असा आरोप मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.”महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी प्रयत्न केले. तर काही जणांकडून आमच्यावर आरोप केले जात आहेत पण आम्ही असं काही केलं नाही, या प्रकरणाची चौकशी करा. उगाच तरूण आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प वेदांताने गुजरातला नेणार असल्याचं सांगितलं होतं अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण हे साफ चुकीचं असून फक्त महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, मी सरकारमध्ये असताना एसटीसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, सध्या एस टी ला स्वतःच्या उत्पन्नातून पगार मिळेल अशी परिस्थिती राहिली नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, यासाठी सरकारनं बारकाईने लक्ष द्यावं असेही अजित पवार म्हणाले.
तसेच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट कोर्टात जावं असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काही वेळेस उच्च न्यायालयात जाऊन देखील परवानग्या घेतल्या आहेत. मागे कोरोनाच्या काळात ते घडलं आहे. बीकेसीत शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. त्यांना ती जागा मिळाली असली तरी इकडची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावी. दोघांनी मेळावे घ्यावे, दोघांचे विचार राज्यानं ऐकावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. त्यांनी त्यांचे नाव घेतलं तर त्यात गैर काय आहे. आम्ही सुद्धा यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. काँग्रेस गांधी-नेहरु घराण्याचे विचार पुढे घेऊन जात आहे. आपण आपल्या पूर्वजांचे नाव घेतले तर त्यात काय चुकलं काय. त्यांची पुण्याई त्यांनी सांगितलं तर त्यात गैर काही नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?
दबंग स्टाईलमध्ये २ कांगारूंची हाणामारी ! व्हिडिओ होतोय तुफान वायरल