सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा चांगलंच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह अयोध्येत पोहचले आहेत. काल दि. ८ अपील रोजी एकनाथ शिंदे हे लखनऊ ला पोहचले तर आता त्यांच्या पाठोपाठ आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लखनऊ मध्ये पोहचले आहेत. शिंदे फडणवीसांच्या या दौऱ्यावर आता संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका ही केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं आहेत. हे ढोंग असून, त्यांना श्री रामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे राऊत म्हणाले. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ म्हणाले होते. मात्र, शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली.
तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने तुरुंगात टाकले आहे. अनेक महत्त्वाचे उद्योगपती आता तुरुंगात आहेत. त्यांनीही काही गुन्हे गौतम अदानी सारखीचं केले. मग, अशा प्रकारची कारवाई अदानी यांच्यावर का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. गौतम अदानी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तुमच्याकडे काय दुधाने आंघोळ करतात का. अनेक उद्योगपती तुरुंगात आहेत. मग, तोच न्याय तोच कायदा गौतम अदानी यांच्याबाबतीत का नाही. हा प्रश्नसुद्धा शरद पवार यांनी विचारायला हवा, अशी विनंती संजय राऊत यांनी केली. या देशातील प्रमुख उद्योगपती आणि काही राजकीय नेत्यांना टार्गेट केले जाते. मुद्दाम अदानी यांना मोकळं सोडलं जाते. लोकांच्या मनात हा संभ्रम आहे. जो न्याय गौतम अदानी यांना दिला जातो तसा न्याय इतर उद्योगपतींना द्या. गौतम अदानी टार्गेट आहेत कारण ते मोदी यांचे जवळचे मित्र आहेत. मोदी यांच्यामुळे त्यांची भरभराट झाली, असा आरोप संजय राऊत यांनी लावलाय.
तसेच यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचे मला दिसले नाही. आम्ही सातत्यानं जात आहोत. तेथील मंदिरासाठीआम्ही संघर्ष केल्याचे राऊत म्हणाले. अयोध्येत जाणं हा एक आनंद असतो. पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कोठून घेणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तेव्हा जर तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामानं असत्याच्या बाजूनं कौल दिला नसता असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार हे अयोध्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
हे ही वाचा :
Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात
Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई