राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. भारत जोडो यात्रेचा १४ दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली. भारत जोडो या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आहे.
राहूल गांधी यांच्या स्वागतसाठी नांदेड आणि महाराष्ट्र सज्ज आहे. अशोक चव्हाणांनी महिनाभरापासून ही तयारी केली आहे. मशाल घेऊन ही यात्रा प्रवेश करणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. अत्यंत उत्साहात जल्लोषात यात्रेत सहभागी व्हायचे आहे. नांदेडची सभा ही १० नोव्हेंबरला भव्य होईल. शेगावमध्ये राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत. या पडयात्रेकडे सरकारचे लक्ष आहे, देशातील प्रश्न मांडण्याचा या यात्रेतून प्रयत्न होत आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी राहिली, त्याच पद्धतीने ही पदयात्रा सुरु आहे, असे थोरात म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांच्या हातात मशाल. क्रांतीचं प्रतिक असल्याने मशाल यात्रा काढत असल्याचं कॅाग्रेसचं म्हणणं आहे. मशाल हे शिवसेनेला नव्याने मिळालेलं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
आज रात्री राहुल गांधी देगलूर वन्नाळी ( प्रसिद्ध गुरुद्वारा ) अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे नऊ किमीचं अंतर असेल. रात्री साडेबारापर्यंत तिथली पूजाअर्चा करुन परत येताना देगलूरला राहुल गांधी कारने येणार आहेत. ८ तारखेला सकाळी पुन्हा कारने वन्नाळीला जाणार आहेत. तेथून यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. रात्रीचा मुक्काम शंकरनगरला असेल , त्याआधी गोपाळा गावात कॅार्नर मीटिंग होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये यात्रेत सहभागी होतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेधा पाटकर यांनीही यात्रेत सहभागाची सहमती दर्शवली आहे. त्यांची नेमकी तारीख ठरलेली नाही. कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांचाही यात्रेत सहभाग असेल. त्यांचीही तारीख निश्चित नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही बदल घडवणारी आहे, ज्याने भाजप नेते भयभीत झाले आहेत. त्यातूनच त्यांच्याकडून काँग्रेसवर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्याचप्रमाणे या पदयात्रेमध्ये अनेक व्यापारी दिग्गज सिने अभिनेत्री अभिनेत्यांची सहभागी होण्याची इच्छा असताना त्यांच्यावर भाजपचा दबाव असल्यामुळे त्यांना या यात्रेत सहभागी होता येत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये व्यक्त केलाय. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नाना पटोलेंसह काँग्रेसचे नेते नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत.
हे ही वाचा :
Thackeray VS Shinde : सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांची धडाडणार तोफ
नाटक संपल्यावरही अनेक लोक सभागृहात थांबलेत, म्हणजे आमची नाटकंही तुम्हाला आवडतात; राज ठाकरे
रणबीर-आलियासाठी अभिनेता कमाल आर खानने दिलेल्या शुभेच्छा पाहून चाहत्यांचा राग अनावर