गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांवर टीका केल्यानंतर त्याविरोधात भाजपा आणि शिंदे गट आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आता सावरकरांवरून ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने आल्याचे चित्र आहे. एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे नेते गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. त्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भरसभेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना सुनावले.
हेही वाचा :
आपल्याला सत्तेत यायचंय, राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, तुमची आमची युती असली तरीही बोलण्याचे भान ठेवा या शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना सुनावले आहे. सावरकर हे मोठेच होते, पण त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, बाबासाहेब आंबेडकर काय बोलले तो त्यांचा अधिकार होता आपला नाही ही माणसं त्यात्या वेळी मोठीचं होती. तुमचे मत असले तरीही जेव्हा एका व्यासपीठावर एकत्र येतो. तेव्हा भान ठेवा. तुम्ही आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नका आम्ही करणार नाही. माझी उध्दव साहेबांकडे तक्रार केली तरी चालेल पण असे बोलू नका असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
प्रा. गंगाधर बनबरे (Gangadhar Banbare) भाषणात बोलताना ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि सावरकर यांची पुस्तकं आमच्यासमोर आहेत. आम्ही सामाजिक चळवळीत काम करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांवर मतं आली की आम्हालाही मतं व्यक्त करावी लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला बुद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हा सावरकरांनी ‘बुद्धाचा आततायी हिंसेचा शिरच्छेद’ असा एक लेख लिहिला होता. तुमची उडी कुंपणाच्या आतच पडली अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बाबासाहेब म्हणाले की आता माझ्या अहिसेंची टिंगल करताय, मग पेशव्यांची सत्ता गेली तर ते काय अहिंसक होते का? ते काय पेशव्यांच्या विचाराचे होते का? सावरकर नरक ओकले असं वक्तव्य बाबसाहेबांनी केलं होतं.” असा बनबरे म्हणाले.