आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरून चर्चा सुरु असून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप युती आणि आघाडीने स्पष्ट केलेले नाही. एकीकडे महायुतीने हि निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले असले तरीही मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याची माहिती आहे. अश्यातच आता भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य करत ‘राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत,’ अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः मंचावर उपस्थित होते. यामुळे महायुतीत अद्यापही मुख्यमंत्रीपदावरून काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त नागपूर येथे भव्य महानुभाव पंथीय संमेलन आणि श्रीपंचावतार उपहार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना परिणय फुके म्हणाले, “फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत तरी ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकासकामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार? फडणवीस यायचं महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. राज्यात एक कोटी महानुभाव पंथीय आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत,” असे ते यावेळी म्हणाले. परिणय फूकेच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवीन राजकीय चर्चा सुरु झाल्या असून निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. सर्व प्रकाराच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपूरमध्ये महानुभाव पंथियांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभाव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाड्मय जिवंत ठेवण्याचं काम महानुभाव पंथाने केलं आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
अखेर राज्यसरकारचे तुपकरांना बैठकीचे निमंत्रण; Ravikant Tupkar यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित