भाजपाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मुलांबद्दल विधानं केली आहेत. अशातच गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला आहे. महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी देखील उत्तर दिलं आहे. महाजन यांच्या आरोपांमुळे कुटुंबाच्या भावना दुखावल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे.
हे ही वाचा : मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी खडसेंवर केला जोरदार हल्लाबोल
“अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते. मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो. असे असताना निखील भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
“निखील भाऊंचा मृत्यू झाला तेव्हा मी तेथे नव्हतो. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी फक्त रक्षा खडसे होत्या. त्यामुळे महाजनांनी जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ रक्षा खडसे यांच्यावर संशय आहे, असा होतो. आमच्या परिवारावर त्यांनी संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आमच्या परिवाराला फार वेदना झाल्या. माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे. माझ्या मित्रपरिवारातून साधारण ६० ते ७० फोन आले आहेत. त्यांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे. ,” अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.
“गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो, हेच यातून दिसते. हा सत्तेचा माज आहे. सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीकादेखील खडसे यांनी केली.
हे ही वाचा :
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुषमा अंधारेंचा थेट निशाणा
Raj Thackeray: ओटीटीच्या सेन्सॉरशिपवर काय म्हणाले राज ठाकरे? ‘यापुढे…’!