संजय राठोड यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या

संजय राठोड यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या

संजय राठोड (Sanjay Rathod) हा विषय आता संपवूया, असं मोठं वक्तव्य भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलंय. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांनाच धक्का देणारं हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे दोषारोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी अचानक युटर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका भाजप तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता. मात्र आता शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यावर चित्रा वाघ यांनी ही भूमिका घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीच संजय राठोड यांना क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर शिंदे भाजप सरकार स्थापन झालं. संजय राठोड यांना क्लीन चिट असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. असे असताना तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचे आयुष्य बरबाद झाले नाही का असा प्रश्न स्थानिक एका वरिष्ठ पत्रकारांकडून विचारताच चित्रा वाघ भडकल्या. आपण न्याय व्यवस्था आहात का? पूजा चव्हाण प्रकरणात मी न्यायालयात गेले आहे. मला शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संबंधित पत्रकाराला सुपारीबाज संबोधले.

 

तसेच, तुम्ही संजय राठोड यांच्याकडून सुपारी घेतली काय, असा प्रतिप्रश्न करत मला तुम्ही शिकवु नका. इथून जावा अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून पत्रकारांना बाहेर काढले. तसेच, संजय राठोड यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण व परिवाराने खूप त्रास सहन केला, असे वाघ म्हणाल्या. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादानंतर पत्रकारांनी वाघ यांचा निषेध नोंदवून सर्व पत्रकार पत्रपरिषदेतून बाहेर पडले.

हे ही वाचा : Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

हे ही वाचा :  आजोबांच्या टीकेवर रोहित पवार यांचे बावनकुळेंना सडेतोड उत्तर

Exit mobile version