शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (गुरुवार, २७ जून) पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference) घेत,विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करत, “मुख्यमंत्री यांची शेती पंचतारांकित असून देशात आणि राज्यात असा शेतकरी नाही,” अशी कोपऱखळीही त्यांनी मारली.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करत म्हणाले, “फक्त अमरावती जिल्ह्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते यापुढे राज्यात एकही शेतकरी जीव देणार नाही. मुख्यमंत्री यांची शेती पंचतारांकित आहे. देशात आणि राज्यात असा शेतकरी नाही. ते आपल्या शेतात हेलिकॉप्टरने जातात. आता शेतकऱ्यांच्या कोणी वाली राहिला नाही.”
ते पुढे म्हणाले, “पिकविम्याचा निधी शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. १ रुपये पिकविम्याची घोषणा केली होती पण अद्याप त्याचा लाभ नाही. दुर्दैवी एनडीए चे सरकार पुन्हा आले आहे. या डबल इंजिनच्या सरकारने पीक कर्ज माफ करुन दाखवावे. तुम्हीपण निवडणुकीच्या पाहिले माफ करा. मी पिक कर्ज माफ केले होते. त्यांनी जाहीर केलेलं आकडे कागदावर आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्याला काही मिळालं नाही. १० हजार २२ कोटी नुकसानभरपाई दिलेली नाही. १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेपटावर निभावलं आणि केंद्रात त्यांचं सरकार आलं. त्यांच्या भाषेत महाशक्तीचे सरकार आलं आहे. आमची जाहीर मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करा आणि निवडणुकीला या. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आमचं सरकार होतं तेव्हा फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली.ती अजून पूर्ण झालेली नाही,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले, “महायुती एकत्रितपणे काम करत आहे. महायुतीने घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहे. आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं? असं विचारत आहेत. शेतकऱयांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती ती रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना इन्सेन्टिव्ह द्यायचे असे म्हणाले होते पण दिले का त्यांनी? ते आम्ही दिले. एका क्लिकवर आम्ही शेतकऱयांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा केले. मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना? शेताच्या बांधांवर जाणारे लोक आम्ही आहोत. शेतकऱ्याशी संवाद साधणार महायुती सरकार आहे. यांना शेतकऱ्याचं दुःख कसं कळणार? त्यासाठी शेतावर जावं लागत… चिखल तुडवावा लागतो… फिल्डवर जावं लागत… घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम चालत नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘पंचतारांकित शेती’ या टिपण्णीवर प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले, “लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती कधीही बरी… शेतकऱ्यांनी पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यानी चांगली नागडी पिके घेऊ नये का? त्यांच्या डोक्यात लिंबू मिरची भरली आहेत.”