मुंबई : आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे गुरू. गुरूच्या पाठिंब्याशिवाय राजकारणातही पुढं जाता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे हे नाव घेतलं की आपसूकच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची नावं डोळ्यासमोर येतात. कारण याच गुरूंच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इथपर्यंत पोहोचल्याचं आपल्या भाषणात वारंवार सांगतात. आज गुरुपौर्णिमेच्या खास दिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन्ही गुरूंना अभिवादन करत ट्विट केले आहे. CM Eknath Shinde special post on Gurupornima
मागच्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या आधी कधीही पाहिला नाही असा सत्ता संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आपल्या गुरूंचे विचार, त्यांची शिकवण सोबत घेऊन आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. आज गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन… असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सोबतच एक फोटो ही शेअर केला आहे. ज्यात आपल्या दोन्ही गुरूंचे फोटो पहायला मिळतायत.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे एकनाथ शिंदे १९८० मध्ये शिवसेना पक्षात दाखल झाले. शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल सुरू आहे. एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत.