काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं. ९,३,८५ सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी ४१६ मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना ७८९७ एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना १०७२ मतं मिळाली. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील नव्हता. गेल्या २४ वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यापूर्वी सीताराम केसरी असे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठीची चुरस होती.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना मोठा धक्का; नगरसेवकांची अपात्रता कायम
शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं. काँग्रेसचं अध्यक्षपद मिळणं ही गौरवाची आणि जबाबदारीची बाब आहे, असं त्यांनी लिहिलंय. मल्लिकार्जून खरगे यांना या कामात पूर्ण यश मिळो. तसेच या निवडणुकीत १ हजार पेक्षा जास्त नेत्यांचा पाठिंबा मिळणं हीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्टी आहे… असं शशी थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.
Called on our new President-elect Mallikarjun @kharge to congratulate him & offer him my full co-operation. @incIndia has been strengthened by our contest. pic.twitter.com/fwfk41T93q
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 19, 2022
मल्लिकार्जुन खरगे यांची राजकीय कारकीर्द
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते ८० वर्षांचे असून अनेक दशकांपासून सक्रिय राजकारणात आहेत. खरगे हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जातात. खर्गे हे कर्नाटकातील बिदर येथून येतात. त्यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले असून ते पेशाने वकीलही आहेत. १९६९ मध्ये खर्गे हे पहिल्यांदा कर्नाटकातील गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यानंतर १९७२ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि विधानसभेत गेले. तेव्हापासून ते २००९ पर्यंत एकूण ९ वेळा आमदार होते. १९७६ मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकात कॅबिनेट मंत्री झाले. १९८८ मध्ये खर्गे यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००५ मध्ये ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी अनेक मोठी पदे भूषवली.