आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत होणार आहेत. एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. तर पक्षाची ही अवस्था पाहून मला वाईट वाटत असून उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असती तर ही वेळ आली नसती असं मोठे वक्तव्य शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणारे रामदास कदम यांनी केले आहे. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्या आवाजाची तोफ बंद केली असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
हेही वाचा :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह दिल्लीत ‘प्रभास’ करणार रावण दहन
“बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापूर्वी ही प्रथा सुरू केली होती. त्यावेळी एक पक्ष, एक मैदान एक झेंडा अशी भूमिका होती. पण आज शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळत आहेत. पण हे सगळे एकाच पक्षाचे आहेत. पक्षावर ही वेळ का आली हा प्रश्न मला आहे. आम्ही ५२ वर्षे पक्षासाठी काम केलं. पण पक्षाची आजची स्थिती पाहून मला दु:ख वाटत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दोन पावले माघार घेतली असती तर पक्षावर ही वेळ आली नसती” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
याआधी देखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवतीर्थावर आयोजित केलेल्या सभेवर टोला लगावला आहे. या ठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदुत्वाचे विचार कसे ऐकतील, ठाकरे यांची शिवसेना आता हिंदुत्वाच्या गप्पा मारते, तेव्हा शिवाजी पार्कमध्ये फक्त शरद पवार आणि सोनिया गांधी यांचेच विचार ऐकू येतील, असे कदम म्हणाले. त्यामुळे बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात हिंदुत्वाची चर्चा करणारे आणि आपल्या हिताची काळजी घेणारेच हिंदुत्वाचे मत ऐकणार आहेत. यासोबतच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रामदास कदम हे ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या दर्शनासाठी गेले असता. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच मी प्रार्थना केली आहे. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत, तसे चांगले निर्णय त्यांनी घेतले पाहिजेत. कदम म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा चांगला मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. असे मत कदमांनी व्यक्त केलं.