आधीच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे: Devendra Fadnavis

आधीच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे: Devendra Fadnavis

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (बुधवार, ११ सप्टेंबर) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधानांनी गणपती बाप्पाची आरतीदेखील केली, मात्र आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. विरोधकांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यावरून चांगलेच आक्रमक झाले असून सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.

या मुद्द्यावरून फडणवीसांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून विरोधकांवर तोफ डागली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा तसेच त्या इफ्तार पार्टीत सहभागी झालेले माजी सरन्यायाधीश के जे बालकृष्णन यांच्या छायाचित्रांचा दाखल देत, “गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

फडणवीस आपल्या ट्विटर पोस्टमधून म्हणाले, “गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात.”

“पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे… हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा…अपमान नाही का?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

हे ही वाचा:

मोदीजी, तुम्हाला देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर अशा खुलेआम हत्या करण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना आवरा: Nana Patole

तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ, Rahul Gandhi यांना BJP नेत्याने दिली जीवे मारण्याची धमकी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version