शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच आक्रमक होतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली. तर आता उद्धव ठाकरे २६ नोव्हेंबरला शेतकरी मेळावा घेण्याची माहिती मिळत आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालपासून म्हणजेच ३१ ऑक्टोबर पासून मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे. यात आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यातच शेतकरी मेळाव्या संधर्बात निर्णय झाल्याचे समजत आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंचा होणारा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दांडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली होती. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यातूनही काही शेतकऱ्यांनी त्यांची पिकं वाचवली होती. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावून घेतलं आहे. त्यामुळ शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकताच २३ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली होती. तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतःरस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
हे ही वाचा :
Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले ‘विष-अमृत नॉमिनेशन कार्य’
All Saints Day 2022 : संत दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि हा दिवस का साजरा केला जातो?