महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळतात. कारण एकनाथ खडसे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असं विखे पाटलांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर असलेल्या ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवर उत्खनन करुन ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच त्यांनी या प्रकरणी एसआयटी (SIT) च्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केलीय.
“मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीन खरेदी करण्यात आली. ही जमिन शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए (NA) प्रदान करण्यात आली होती. विशेष म्हणजे आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये अर्ज सादर करण्यात आला होता. काही दिवसांनी प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरुन अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोळ झाला”, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता.
चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांवर एकनाथ खडसे यानजी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे,”संबंधित जमीन हायवेला दिलेली आहे. केंद्र सरकारची सूचना आहे की, नॅशनल हायवेला जमीन देत असताना कुठल्याही प्रकारची रॉयलटी लागत नाही. मग किती हजार ब्रॉस राहिली किंवा दोन हजार राहिली, त्यामध्ये त्यांनी २० हजार ब्रॉस रॉयल्टी नेलेली आहे, असं सरकारचं म्हणणं आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“खनिकर्म विभागाने चौकशी केली तेव्हा २० हजार ब्रॉस काढल्याचा अहवाल आहे. त्यामुळे २० हजार ब्रॉस रॉयल्टी भरल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मोफत नेल्याचा सुद्धा रिपोर्ट पुरावा आहे. यामध्ये भ्रष्टाचार कुठे आला? आणि यामध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. ४ कोटींची जमीन आणि ४०० कोटींचा गैरव्यवहार कसा? निव्वळ बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी सभागृहाचा वापर चाललाय हे धोकादायक आहे.
एसआयटी चौकशी करा किंवा कोणतीही यंत्रणा बसवा. जे केलेलंच नाही त्याला काय घाबरायचं. जे आहे ते करा, सगळं समोर आहे”, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली होती.
हे ही वाचा:
विजयस्तंभ भीमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा, अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत
“तुम्ही ड्रायव्हर घेऊ शकता”, कार अपघातानंतर कपिल देव यांचा ऋषभ पंतला संदेश
अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला तिचा ग्लॅमरस लुक