एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदारांसह बंड केला. त्यामुळे महाविकास आघाडी चे सरकार अल्प मतात आले आहे. राज्यातील सुरु असलेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी उशिरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. फेसबूक लाईव्ह वर त्यांनी जनतेशी संवाद साधत ही घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे १ जुलै रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिले आहे.
भाजप कडून राज्यातील राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असून लवकरच ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार अशा चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एक नवीन ट्विट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट
या ट्विट मध्ये ”भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका”. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. सोबतच शिंदे यांनी आणखी एक ट्विट करत. ”वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस”. असं ही म्हटलं आहे. त्यामुळे आज दिवसभरात राज्यातील राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.