Maharashtra Assembly Winter Session 2022 : नागपूर येथे सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आजपासून दुसरा आठवडा सुरु झाला आहे. आजची विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.
आजपासून दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. आज विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तर, राऊत यांचे बॉम्ब फुसके असल्याचे प्रतिहल्ला भाजपने केला होता. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई, सीमा प्रश्न, एनआयटी भूखंड प्रकरण आदी मुद्यांवर आजही विरोधक सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
मनालीमध्ये साताऱ्यातील युवकाचा भीषण अपघात, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने झाला दुर्दैवी मृत्यू
सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोस्ट सर्वत्र वायरल