आजच्या काळातही समाजाच्या उभारीसाठी महात्मा फुले यांचे विचार अतिशय उपयुक्त – शरद पवार

महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम पुढे नेण्याचे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे,

आजच्या काळातही समाजाच्या उभारीसाठी महात्मा फुले यांचे विचार अतिशय उपयुक्त – शरद पवार

Sharad Pawar

महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम पुढे नेण्याचे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा. महात्मा फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

संबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्याकाळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ आणि सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले असल्याचे सांगत महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी रुजवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच या कार्यक्रमाला राज्यभरातून महिला व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

२० हजार पोलिसांची पदं भरणार – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेला नवा धक्का, बाळासाहेबांचा ‘हा’ विश्वासू सेवक झाला शिंदे गटात सामील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version