महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला काही कवी बघायला मिळतात. कोणतीही गोष्ट होऊ द्या ते कविता करत बसतात. काही राजकीय विदूषक सुद्धा आहेत आणि या विदूषकांमुळे मोठ्या राजकीय नेत्यांची फजिती होते. हे जर आपल्याला बघायचे असेल तर त्यासाठी आपल्याला एका नेत्याचा अभ्यास करावा लागेल त्या नेत्याचं नाव आहे चंद्रकांत पाटील. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक पदे आहेत. त्यामध्ये ते उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रद्योग मंत्री अशी मंत्री पदं आहेत. ते माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. ही सर्व पदे तर त्यांच्याकडे आहेतच पण ते राजकीय विदूषकही आहेत असे म्हणणे वावगं ठरणार नाही ते कसे हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
याच चंद्रकांत पाटलांच्या पोपटपंचीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकाला कांदे लावण्याची वेळ आली आहे.
नुकतीच शिवसेनाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये ते आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर म्हणजेच सुभाष देसाई, संजय राऊत, भास्कर जाधव यांच्याबरोबर सहभागी झाले होते. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक परफेक्ट फटका मारला आहे की ज्याच्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या सरकारची कोंडी झालेली आहे. या कोंडीचा जर आपण विचार केला तर आयपीएलचा मोसम असल्यामुळे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर शिंदे छान फटकेबाजी करत होते, नॉनस्ट्राइक एन्डला चंद्रकांत पाटील नावाचे राजकीय विदूषक उभे होते. आणि क्रिकेटचा खेळ जसा सांघिक असतो. त्यात दुसऱ्याची चूकही महाग पडते. त्याच प्रमाणे चंद्रकांत पाटलांनी नॉनस्ट्राइक एन्डला असं काही करून टाकलं ज्याच्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्लीन बोल्ड होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला या अयोध्या दौऱ्यामध्ये शिंदे गटातले बरेचसे आमदार अयोध्येला गेलेले नव्हते. बरेच खासदारही सहभागी नव्हते. त्यामधील शिंदेबरोबर गेलेल्या ४० पैकी १६ आमदारांची अस्वस्थता तर प्रचंड वाढीला लागली आहे. हे १६ आमदार खूप अस्वस्थ आहेत. त्यांना कोणत्या ठिकाणावरून युटर्न मारायचा हेच त्यांना कळत नाहीय. .कारण ते आता भाजपसोबत गेलेले आहेत आणि शिंदेंना त्यांच्यासाठी जे काही करता येईल तेही करून झालेलं आहे. आता युटर्न मारायचा तरी कसा मारायचा? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. मग त्यांच्या उपयोगी पडले आहेत ते भाजपचे नेते चंद्रकांत पाटील.
चंद्रकांत पाटील रुपी विदूषक या १६ आमदारांना उपयोगी पडले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याआधीही अनेक विधाने केली होती. त्यामधील पहिले विधान होते की, मी कोल्हापूरमधून निवडून आलो नाही तर मी हिमालयामध्ये निघून जाईन. कोल्हापूरमध्ये ते निवडूनच येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण उत्तर कोल्हापूर, दक्षिण कोल्हापूर, कागल या कुठल्याही मतदार संघामध्ये आपला मतदार संघ बांधणं त्यांना जमलेलं नाही. त्यांनतर ते पुण्यामध्ये असलेल्या भाजपच्या महिला आमदाराला घरी पाठवून स्वःत आमदार झाले त्यानंतर पण त्यांचे विदुषकी चाळे काही कमी होत नाहीत. त्यांनी तर थेट बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भाऊराव पाटलांचाही अपमान केला आहे ते म्हणाले होते की, बाबासाहेब आंबेडकर असतील, भाऊराव पाटील यांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभ्या केल्या आहेत. त्यानंतर प्रचंड संताप उसळला होता. त्यांनतर त्यांना पूर्णतः कोंडीत पकडले होते तेव्हा त्यांनी माफी सुद्धा मागितली होती.
आता त्यांनी शिवसेना प्रमुखांचा अपमान केला आहे बाबरी मशिदीचा ढाचा पडला त्यावेळेला शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या शिवसैनिकांचा यामध्ये सहभाग नव्हता अशा स्वरूपाच त्यांनी वक्तव्य केले आहे. त्याआधी त्यांनी ‘सुप्रिया सुळे यांना जर राजकारण जमत नसेल तर त्यांनी घरी जाऊन धुणी भांडी करावी’ असे म्हणाले होते. तेव्हा सुद्दा राष्ट्रवादीने त्यांचा समाचार घेतला होता. एवढेच नाही तर जेव्हा पुण्यामध्ये पोट निवडणूक लागली त्यावेळी ते म्हणाले होते Who is Dhangekar? पण याच धनगेकरांनी शेकडो कोटी रुपयांच्या शिवसेना- भाजप युतीने चुराडा केल्यानंतरही विधिमंडळामध्ये प्रवेश केला आणि ते जिंकून आले त्यानंतर हेच चंद्रकांत पाटील म्हणाले की मी धंगेकरांचं कौतुक करतो, अशा पद्धतीत सतत टोप्या फिरवणं सतत उलट सुलट बोलत राहणं हि आता चंद्रकांत पाटीलांची खासियत झाली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांची परिषद झाली तेव्हा ते म्हणाले की, हा शिवसेना प्रमुखांचा अवमान आहे मग जर शिवसेना प्रमुखांचा जर अवमान करणाऱ्या मुख्यमंत्र्याना म्हणजेच मिंधेना जर एकनाथ शिंदेना यांना जर बाळासाहेबांचे विचार प्यारे असतील तर त्यांनी चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी नाही तर स्वतः राजीनामा दिला पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी उत्तरप्रदेशचे सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी उत्तरप्रदेशमध्ये जो माहौल तयार केला होता. तो आजपर्यत महाराष्ट्राच्या एकाही राजकीय नेत्याच्या स्वागतासाठी झालेला नव्हता मग असं असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकाला कांदे लावण्याची वेळ चंद्रकांत पाटलांमुळे आली आहे. हे चंद्रकांत पाटील कोण? तर हे चंद्रकांत पाटील दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठीच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे एवढंच त्यांचं एक क्वॅालिफिकेशन आहे. असं म्हणायची वेळ आली आहे त्यांनी पक्षपातळीवर पक्षाचे तीन तेरा वाजवले आहेत. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनतर चंद्रकांत पाटील स्वःत बोलायला समोर आले. याचं कारण त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. याच चंद्रकांत पाटीलांनी याच्याआधी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना देवेन्द्र फडणवीस यांची प्रचंड कोंडी केली आहे. पण तरीही चंद्रकांत पाटील यांचं राजकारण, त्यांची राजकीय समज ही अत्यंत तोकडी असल्यांनंतरही त्यांना झुकतं माप दिल जात आहे. हीच भाजपच्या नेत्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील समोर आले आणि ते म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता मी मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यावेळी त्यांनी सावरासावर केली ती कशी केली ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांना फोन करून सांगणार आहे की माझा काही स्व. शिवसेनाप्रमुखांचा असा अवमान करण्याचा आणि शिवसैनिकांना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व गोष्टी नीट करत आहेत हे भाजपच्या नेत्याच्या सुद्धा लक्षात आले आहे. आणि शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या लोकांच्याही लक्षात आले आहे. याच कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोनदा जाहीरपणे शाब्बासकी दिली आहे आणि अमित शाह यांच्या तर ते ‘आंखो का तारा’ झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडणे भाजपच्या नेत्यांना जमत नाहीये. त्याचप्रमाणे ठाकरे गटाला सुद्धा जमत नाहीये. त्यामुळे फॉर्मात आलेले शिंदे सहजपणे झेलबाद होऊ शकतील किंवा त्यांची खेळी संपू शकते अशा पद्धतीची व्यूहरचना चंद्रकांत पाटील करत आहेत का? चंद्रकांत पाटील यांनी देवेन्द्र फडणवीस यांना भंडावुन सोडले होते. त्यांनतर पक्षाला भंडावुन सोडले होते आणि आता ते शिंदे भंडावुन सोडत आहेत.
शिवसेनाप्रमुखांबाबत आणि बाबरी मशिदीच्या संदर्भामध्ये त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण काय म्हटले आणि त्याचा कसा विपर्यास झाला हे सांगण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहे. परंतु हे सगळं खोट आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्याकडून ते विधान या आधी करून झाले आहे. त्यामुळे आता चंद्रकांत यांना मंत्रिपद सोडावे लागणार की मोदी आणि शाह हे दिल्लीतून राज्यात बसलेल्या चंद्रकांत पाटलांचे कान उपटणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे. परंतु तोपर्यत एकनाथ शिंदे हे जरी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी त्यांना या घटनेमुळे ICUमध्ये नेण्याची वेळ येतेय का ? हे पण बघावे लागेल. राजकीय ICU मध्ये त्यांना न्यावे लागणार कारण सध्या कमालीचा फॉम गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांचा अपमानाचा अचानक एक मुद्दा हाती सापडला आहे. आणि त्यांनी तो मुद्दा व्यवस्थितरित्या हाताळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेवरून पाटलांच्या पोपटपंचीने शिंदेच्या नाकाला कांदा लावण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा :
Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात
Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई