पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने ५ वर्षासाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
“पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
देशातून सर्वात आधी केरळने पीएफआय संघटनेवर बंदी घाला अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राज्यातून ही मागणी झाली होती. पीएफआय संबधी सर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दरम्यान राज्यात देखील या लोकांनी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता असंही फडणवीस म्हणालेत. ‘सिमी’ या अतिरेकी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर काही लोकांनी एकत्र येत पीएफआयसारखी संघटना काढली आहे. देशातील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे देशविघातक तत्वांनी ही नवी पद्धत शोधून काढली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. देशातील उत्तर-पूर्व भागात मशीद तोडल्याच्या खोट्या प्रचारानंतर राज्यात तीव्र आंदोलन आणि तोडफोड करण्यात आली होती. पीएफआयकडून अशाचप्रकारचे कृत्य केले जात होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
Lata Mangeshkar : लता दीदींच्या जयंतीच्या दिवशी मोदींनी दिली अनोखी भेट