सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे. सर्वांचे लक्ष हे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे आहे. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी चर्चा देखील जोरदार सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे कामाला देखील लागले आहेत. राज्यात नुकतंच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन झालं आणि त्यानंतर पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, असे साधारणतः बोलले जाते आणि राजकारणी देखील त्याचं तंतोतंत पालन करतात. मात्र यंदा होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सध्याचे चित्र काही वेगळं असल्याचं एकंदरीत दिसून येत आहेत. एकीकडे बैठकांचा जोर सुरु आहे तर दुसरीकडे जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे.
पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे साधारणतः बोलले जाते परंतु याच काळात राजकीय बैठका आणि राजकीय कार्यक्रमांना मात्र चांगला जोर आल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या पितृपक्ष असल्यामुळे कोणत्याच पक्षाकडून जरी उमेदवारांची घोषणा केली जात नसली तरी याच पितृ-पंधरवड्यात बैठकांचा जोर मात्र वाढलेला आहे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे. त्यात महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात ६ जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. गेल्या २ दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठका चालू आहेत. त्यात ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले, अतुल लोंढे बैठकीला हजर होते. भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, माहिम-दादर या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चुरस आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी केली आहे. पुढील २ दिवस जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत.
महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीमध्ये देखील जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत १५५ जागा हव्या आहेत. १३३ जागा दोघांमध्ये वाटून घ्यायला शिंदेसेना, अजित पवार गट यांची तयारी नाही. शिंदेसेनेला किमान १०० जागा हव्या आहेत आणि अजित पवार गट ६० पेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपची २३-२४ सप्टेंबरला मुंबईत मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजित पवार- शिंदे गटाच्याही निवडणुकांच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत. महायुतीकडून राज्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील वर्धामध्ये उपस्थित आहेत. एकूणच काय पितृपक्षात बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि निर्णय घेतले जात नाहीत असे बोलले जाते. मात्र याच काळात यंदा राजकीय बैठका आणि पक्षाचे कार्यक्रम मात्र जोमात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ