गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे.40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला.मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी हा राजभवनावर पार पडला आहे. दरम्यान, शपथविधीनंतर शिंदे-फडणवीस सरकारला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2022
एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी पडला पार
आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शपथविधीच्या भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ अश्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.