शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य असणार आहे. चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात आता दोन्ही बाजूंना लेखी स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याआधी सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता. यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आलीय. काल (सोमवारी) पार पडलेल्या युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने कायदेशीर बाबींवर दिल्ली हायकोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावरही कोर्टात सुनावणी सुरु आहे. अशा वेळी चिन्ह गोठवण्याचा निर्णय कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
हेही वाचा :
कालचा युक्तिवाद
दिल्ली हायकोर्टात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून काल जोरदार युक्तीवाद करण्यात आला. “मी पक्षाचा अध्यक्ष असून ३० वर्षांपासून पक्ष चालवतोय”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली हायकोर्टात वकिलांमार्फत म्हणाले आहेत. “प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. “निवडणूक आयोगाचे चिन्ह गोठवण्याचे आदेश बेकायदेशीर आहेत”, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. “या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामं खोळंबली आहेत. मी माझ्या वडिलांनी दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही”, अशी उद्धव ठाकरे यांची बाजू वकिलांनी कोर्टात मांडली आहे.
दरम्यान, पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही. शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलीय. ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर दिल्ली हायकोर्ट आता काय निर्णय घेतं? ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते का? शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का? यावर दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.