शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतआज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी होत आहे. विधीमंडळातील सुनावणीत अॅड. असीम सरोदे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटासाठी निहाल ठाकरे बाजू मांडतील. दरम्यान ही सुनावणी कशी होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुनावणी कक्षात सुनावणी होत असताना सुनावणी ठिकाणी आसन क्रमांक ७ ते ११दरम्यान सर्व जण बसतील. वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील. त्यानंतर अनुक्रमणिकानुसार याचिकाकर्त्यांना बोलावलं जाईल. वकीलामार्फत ज्यांना बाजू मांडायची आहे त्यांना अधिकार पत्र सादर करावे लागेल. भविष्यातील समन्वयासाठी वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप नंबर द्यावा लागेल जेणेकरुन पुढील माहिती त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पुरवली जाईल. सुनावणी कक्षात फक्त वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना परवानगी असेल. इतर कर्मचारी व वकिलांना विनापरवानगी प्रवेश मिळणार नाही. मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिर डिव्हाईस सायलेंटवर ठेवावेत. कुणालाही रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नसेल जर कुणी रेकॉर्डिंग केल्यास कारवाई होईल. गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.आतपर्यंत सुनावणीला उपस्थित असलेले दोन्ही गटाचे आमदार त्यामध्ये शिंदे गटातून यामिनी जाधव, भरत गोगावले, बालाजी किणीकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकार,संजय शिरसाठ, संजय रायमूळकर, सदा सरवणकर, महेंद्र थोरवे,महेंद्र दळवी,शांताराम मोरे,किशोर अप्पा पाटील, प्रदीप जैस्वाल, विश्वनाथ भोईर,ज्ञानराज चौगुले, दिलीप लांडे, योगेश कदम, प्रकाश सुर्वे,सुहास कांदे आणि त्यानंतर अपक्ष नरेंद्र बोंडेकर तर ठाकरे गटातून सुनील प्रभू, सुनील राऊत,राहुल पाटील,अजय चौधरी,संजय पोतनीस, रवींद्र वायकर, वैभव नाईक, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रमेश कोरगावकर, उदयसिंह राजपूत, प्रकाश फातर्फेकर,राजन साळवी, कैलास पाटील हे आहेत.
हे ही वाचा:
उपोषण सोडताना जरांगेंच्या मंचावर ‘हे’ नेते होते उपस्थित
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता