एकीकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे नेमकं कुणाचं यावरून दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे आज दि. २१ जानेवारी रोजी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभा पार पडला. या समारंभाला सर्व नेतेमंडळींनी आज हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ही दिग्गज नेतेमंडळी काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी साखर उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांच्या उत्पादकतेचं कौतुक तर केलेच पण संधी साधत दावोस करारांवरून शरद पवारांच्या समोरच विरोधकांना टोला लागावला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते असा उल्लेख केला आहे.गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार.मी नुकतंच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. तसेच पुढे त्यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शरद पवार सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. ते अनुभवी नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळेच कुठला माणूस सत्तेवर बसलाय, हे न पाहाता या राज्याच्या हितासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. मलाही ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात, सूचना करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे. असंख्य शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प राबवत आहोत. या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले,“एखादा माणूस, संस्था जेव्हा चांगलं काम करतात, त्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यावर ते आणखीन चांगलं काम करू लागतात. इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात. प्रत्येकात स्पर्धा निर्माण होते की आपणही चांगलं काम केलं पाहिजे. त्यामुळे समाजात चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते आणि त्याचा समाजाला फायदा होतो”, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी नमूद केलं.
हे ही वाचा:
नेते-अभिनेते लावतात हजेरी, जाणून घ्या नक्की कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?
चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक खुलासा म्हणाले भाजपा नेतेच करतायत पंकजा मुंडेंना बदनाम