५ ऑक्टोबर रोजी कधीच घडलं नाही ते घडलं. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावा आयोजित करण्यात आले होते. आपल्या सर्वांना वाटल्याप्रमाणे दोनी गटाकडून एक मेकांनवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यासोबतच चर्चा झाली ती या मेळाव्यांना उपस्थिती लावलेल्या इतर नेतेमंडळींची. उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे हे शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यासह व्यासपीठावर आल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता त्यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं आहे.
आज जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचं सांगतानाच भविष्यात जर आपल्यावर शिवसेनेनं जबाबदारी दिली, तर ती पार पाडण्यासाठी निश्चितच काम करेन, असंही जयदीप ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. अशा संकटप्रसंगी कुटुंबासमवेत असं, हे माझं कर्तव्यच आहे, अशी भूमिका जयदीप ठाकरेंनी मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन एक ठाकरे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “कुणी कुठली बाजू घ्यायची, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचं आपापलं मत असतं. ते तिथे का गेले, हे त्यांनाच विचारायला हवं. मी या घराचा सर्वात मोठा नातू आहे. मला माझ्या आजोबांबद्दल, उद्धव काकांबद्दल, आदित्यबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्यासमोरचं हे चित्र फार विचित्र आहे. अशा वेळी माझ्या कुटुंबासोबत असणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो”, असं जयदीप ठाकरे म्हणाले.
रश्मी काकी आणि आदित्य यांच्याशी मी बोलत असतो. दसरा मेळाव्याच्या दिवशीही आम्ही बोललो. उद्धव काकांनाही भेटलो. त्यांना मला व्यवस्थित भेटायचं आहेच. त्यांची वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटेन”, असंही जयदीप ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. अशा वेळी सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र यायला हवं. पण ते सध्या होत नाहीये. मला जे बरोबर वाटलं, ते मी केलं. मला वाटलं मी दसरा मेळाव्यात जाऊन माझ्या काकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. ते मी केलं”, अशा शब्दांत जयदीप ठाकरेंनी शिंदे गटाच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचा ८०० पानांचा रिप्लाय निवडणूक आयोगाला सादर
Adipurush : प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाच्या पहिल्या टीझरमुळे ‘रामायण’ची टीम विरोधात