राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची मोठी घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
ठाणे येथील विवियाना मॉलमधील प्रेक्षकांना मारहाण केल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.