“महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा,” असे आवाहन करुन महाराष्ट्रात मविआचे सरकार आले की केंद्रातील मोदी सरकारही जाईल,” असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला, या कार्यक्रमात खरगे बोलत होते. खरगे पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श, प्रेरणास्रोत आहेत पण नरेंद्र मोदींचा हात त्यांच्या पुतळ्याला लागताच पुतळा कोसळला. मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पडला, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली. नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात. घाईघाईत पुतळा बनवल्याने तो कोसळला व महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान झाला.”
काय म्हणाले राहुल गांधी?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावेळी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी पुतळ्याचे काम आरएसएसच्या व्यक्तीला दिले, त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली का? असा सवाल विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे असे म्हणाले. शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले, नोटबंदीमुळे लघु, छोटे, मध्यम उद्योग संपवले व लाखो लोकांचे रोजगार घालवले, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला त्याबद्दलही माफी मागा,” असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील यांच्या समवेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते.
हे ही वाचा:
Uddhav Thackeray यांना त्यांची जागा कळाली आहे: Sanjay Shirsat