मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरु आहे. लातूर येथे आज (मंगळवार, ९ जुलै) शांतता रॅलीचा चौथा दिवस पार पडत आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करत, “छगन भुजबळला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत,” असा आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, “छगन भुजबळला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत. अंतरवाली सराटीत छगन भुजबळने ओबीसी समाजाला रॅली काढायला लावली. छगन भुजबळला महाराष्ट्रात कुठे जागा भेटली नाही का? अंतरवाली सराटीतच छगन भुजबळने रॅली का काढली? भुजबळला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “कायदा काय सांगतो, की जे निकष ओबीसीला लावलेत तेच निकष आम्ही पार करून दाखवू. जर शेती या व्यवसायाच्या आधारावर ओबीसी व कुणबींना आरक्षण मिळालं असेल तर मराठा समाज देखील शेतीच करतो. भारत देशात मराठाच असा एक समूह आहे जो 10% मागासवर्गीय आहे. मंडल कमिशनने ओबीसी आरक्षणात घातलेली कोणती जात मागास सिद्ध केली. कोणत्या जातीची जनगणना केली. कोणती ओबीसींची यादी तयार केली. मंडल कमिशनने केवळ इंग्रजांच्या काळातील डेटा वापरलाय,” असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीसाठी आज लातूर येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांनी आज लातूरमध्ये स्वामी विवेकांनद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शाहू चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.
उद्या धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्या तयारीची अंतीम बैठक आज पार पडली. या बैठकीत जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांना त्यांचे काम वाटून दिले असून प्रत्येकाला टी शर्ट, ओळखपत्र देण्यात आले असून हे स्वयंसेवक रॅली मार्गासह चौका चौकात नियोजन करणार आहेत.
हे ही वाचा:
जयंत पाटील यांनी उघडकीस आणला मोठा गैरप्रकार, मेघा इंजीनियरिंग कंपनीवर सरकारची ‘मेगा’ मेहरबानी
Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार ? Bacchu Kadu तिसरी आघाडी स्थापन करणार?