सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्या असल्या तरी महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. अश्यातच कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं. परंतु त्याच्या या विधानाला विरोधकांनी मात्र चांगलंच फैलावर घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP) प्रवक्त्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतुत्तर देत सडेतोड टीका केली आहे. रुपाली पाटील यांनी ‘तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत,’ असे वक्तव्य केले आहे. यामुळे आता महायुतीतला संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या, “हेच ते तानाजी सावंत आहे, जे धरण खेकड्यांमुळे फुटलं म्हटले होते. हपकिन हा माणूस आहे, असे ते म्हटले होते. त्यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत. एवढीच मळमळ होत असेल तर तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते. साखर कारखान्याला भरघोस निधी घेताना मळमळ कुठे गेली होती. एवढेही बेताल बोलू नका, की महाराष्ट्राच्या जनतेला तुमची लाज वाटेल. बोलताना विचारपूर्वक बोला, याचा शेवट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
तानाजी सावंत यांचा नागरिकांशी सांवाद साधतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. यामध्ये ते म्हणतात, “आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये असलो तरी पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो कि उलट्या होतात. आपल्याला त्यांची ऍलर्जी आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.
हे ही वाचा:
भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis
शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून