खराब रस्त्यांचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये भेडसावत आहे. आता थेट रस्ते वाहतूक मंत्र्यांनीच खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेची माफी मागितली. जाहीर सभेमध्ये गडकरींनी लोकांची माफी मागितली असून जुना करार रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत. नितीन गडकरी मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी गडकरी यांनी खराब रस्त्याबद्दल माफी मागितली. नितीन गडकरी म्हणाले, “४०० कोटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या ६३ किमीचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही. प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुनं काम दुरुस्त करून नवीन निविदा मागवल्या आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल माफ करा.”
नितीन गडकरी म्हणाले, “जर चूक असेल तर त्यासाठी माफी मागण्यात मला काही कमीपणा वाटत नाही. मंडला ते जबलपूर जो मार्ग आहे, त्यामध्ये बरेला ते मंडला हे ४०० कोटींचे ६३ किलोमीटरचे जे दोन लेनचे काम होत आहे, त्यावर मी समाधानी नाही. आता समस्या ही आहे, की अनेक अडचणी आल्या आहेत आणि अनेकदा तुम्हाला त्रास होत आहे. आज मी इथे येण्या अगोदरच माझी अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. प्रलंबित कामाला स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. झालेले काम अगोदर दुरूस्त करा, नवीन कंत्राट काढा आणि लवकर हा रस्ता चांगल्याप्रकारे पूर्ण करून द्या, असं मी त्यांना सांगितलं आहे. आतापर्यंत यामुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे, त्यासाठी मी माफी मागतो.”
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमधील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगला असल्याचा दावा केला होता. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना त्यांचा हा दावा जाहीर कार्यक्रमात खोडून काढल्याचे दिसून आले. ४०० कोटींचा खर्च करून तयार होत असलेला ६३ किलोमीटरचा रस्ता खराब असल्याचे पाहून वाईट वाटल्याने गडकरींनी शिवराज सिंह चौहान यांच्या समक्ष जनतेची माफी मागितली. रस्ता कामावर मी समाधानी नसल्याचं गडकरींनी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवल्या.
हे ही वाचा :
भारत जोडो यात्रेवर होणाऱ्या खर्चाची चौकशी करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
KBC मध्ये बिग बिंना यांना विचारला प्रश्न :उत्तर देताना बिग बी झाले भावुक