राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी वादावर जोरदार खडाजंगी चालू आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसींमधून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे इतर ओबीसी नेते यावर विरोध करत असून ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) इतर वाटेकरी नको अशी मागणी करत आहेत. राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज (सोमवार, २४ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील आरक्षणविषयावर चाललेल्या वादावर भाष्य केले. तसेच ‘ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आले, निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले,’ असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, “ओबीसी नेते हे निवडणूक लढवण्यासाठी एकत्र आलेले नाहीत. ओबीसीच्या हक्कांसाठी संरक्षणासाठी व आरक्षणासाठी एकत्र आले आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसी नेत्यांनी तत्व पाळले. ज्यावेळेस सर्व ओबीसी नेते व ओबीसी समाज बांधव एकत्र आले. तेव्हा तुम्ही आम्हांला म्हणता की निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आले. ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता, तेव्हा येथील व्यवस्था हातात घेण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येता, ” असा टोला त्यांनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला.
ॲट्रॉसिटी कायद्याबाबता भाष्य करत ते पुढे म्हणाले, “दलितांचा जो संरक्षणाचा कायदा आहे, तो म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा हा ॲट्रॉसिटी कायदा बंद व्हावा. यासाठी राज्यभरात शेकडोच्या संख्येने मोर्चे काढले व ॲट्रॉसिटी कायदा बंद करावा अशी मागणी केली. तसेच ॲट्रॉसिटीचे कायदे कुणा विरोधात आहे, हे सुद्धा आंबेडकरी जनतेने पहावे. महाराष्ट्राची आयडेंटिटी वेगळी, पण सामाजिक न्यायाच्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राची धोरणे कमी आहेत. त्याचमुळे महाराष्ट्रातील पुढारी व पुढारी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील आमदार खासदार यांची कौन्सिलिंग होणे गरजेची आहे. त्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे. कारण यांना संविधान माहिती नाही,” असा टोला त्यांनी आमदारा खासदारांवर लगावला आहे.
हे ही वाचा
Follow Us