सप्टेंबर सत्तारुढ पक्षाचे आमदार लोकसभेच्या माननीय विरोधी पक्षनेत्यांची जीभ छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बघ्याची भूमिका घेतात, ही आज राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची विदारक स्थिती आहे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या सरकारने केलं आहेच, पण राजकीय सलोखा आणि संसदीय प्रथा, परंपरा, सन्मान धुळीला मिळवण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सरकारने आमदार संजय गायकवाड विरोधात त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्यासाठी ११ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. संजय गायकवाड हे औकाती बाहेर बोलत आहेत आणि वागत आहेत. यांची सत्तेची मस्ती आणि माज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनताच उतरवेल अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे आरक्षणासाठी, संविधान वाचविण्यासाठी सातत्याने रस्त्यावर आणि सभागृहात तीव्र लढा देत आहेत. हुकुमशाही वृत्तीने देश चालविणाऱ्या सरकारला संविधानाने देश चालविण्याचा आग्रह धरीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला धक्का लावण्याचा मनसुबा धरणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमतापासून रोखण्याचं काम जनतेनं केलं आणि जनतेपर्यंत हा मनसुबा पोहोचविण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून मानसिक संतुलन देखील ढळलं आहे. त्यामुळेच लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची जीभ छाटण्याची भाषा आज ते वापरत आहेत. राज्यातील जनता स्वाभिमानी आहे, शहाणी आहे. ही जनता योग्यवेळी हिंसाचारवृत्ती बाळगणाऱ्यांना योग्य धडा शिकवीलच. हिंसेला चिथावणी देणाऱ्या आमदारा विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय मिळवला वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
Follow Us