शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक शिवसेनेतील दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह देण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या चिन्ह नव्याने द्यायला सांगितली असली, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे. काल याबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. यानंतर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला.
संजय पवार यांना शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जो ठाकरे नावात दबदबा आहे, त्यामुळे कोण बाळासाहेब? आम्ही नाही विचारत. महाराष्ट्रातील जनताच विचारत आहे, बाळासाहेब कदम, बाळासाहेब थोरात? हे त्यामुळे स्पष्ट होत नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंमतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे नावं दिलं आहे, तस तुम्ही तुमचं नाव द्यायला हवं होतं. मी माझा पक्ष काढला असता, तर संजय मारुतीराव पवार म्हटले असते. हिंमत आणि दम मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे.
मशाल हे क्रांतीचं चिन्ह आहे, विरोधकांचा नाश होईल, त्याची सुरुवात अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून सुरु होईल, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला. ते म्हणाले की, मिळालेल्या नावाचं आणि चिन्हाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी याचा आनंद साजरा करू लागले आहेत. चिन्ह नवीन, पक्ष नवीन असला, तरी काम ५६ वर्षाचे आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे चार अक्षरी नाव आमच्या हृदयात बसलेलं आहे, पण भीतीपोटी त्यांनी षड्यंत्र करून काढून घेतलं आहे. हे पाप त्यांना लागणार, लाखो शिवसैनिकांच्या शिव्याशाप त्यांना लागतील. कारण तुम्ही आमचा धनुष्यबाण काढून घेतला आहे. त्यामुळे कधीही महाराष्ट्र आणि शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही.
हे ही वाचा :
चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया